सभापती डॉ. सांगळेंंचा उपोषणाचा इशारा; सत्ताधारी शिंदे गटाला घरचा आहेर
मनमाड : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गंभीर बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप खुद्द बाजार समितीचे सभापती डॉ. संजय सांगळे यांनी केला आहे.
बाजार समितीच्या मालकीच्या भूखंडांची नियमबाह्य विक्री करून सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत, सांगळे यांनी थेट बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, डॉ. सांगळे सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे असून, त्यांनी आपल्याच व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारल्याने राजकीय वर्तुळात याला घरचा आहेर मानला जात आहे.
डॉ. सांगळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपासून भूखंडांची जणू विक्रीच सुरू आहे. बाजार समितीच्या आवारातील भाजीमंडई आणि इतर महत्त्वाच्या लिलावांसाठी राखीव ठेवलेल्या जागांची पटापट विक्री करण्यात आली आहे. जवळपास 40 ते 50 भूखंडांचे परस्पर करारनामे (अॅग्रिमेंट) करून अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांचा मोठा गैरव्यवहार म्हणजेच भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत
आहे.
विशेष बाब म्हणजे, बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड यांनी याआधीच याप्रकरणी पणन संचालक यांच्याकडे तक्रार केलेली आहे. या गंभीर भूखंड विक्री प्रकरणी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेशदेखील दिले आहेत.
मात्र, वरिष्ठांचे चौकशीचे आदेश असतानाही बाजार समितीमधील भूखंडांची बेकायदेशीर विक्री अजूनही सर्रास सुरूच आहे. या मनमानी कारभाराला बाजार समितीच्या अनेक संचालकांनी देखील तीव्र विरोध दर्शवला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी चौकशी अधिकार्यांना पैशांची देवाणघेवाण करून मॅनेज करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा अत्यंत गंभीर आरोपही या पत्रात केला आहे.
शिंदे गटातील खदखद चव्हाट्यावर
मनमाड आणि नांदगाव परिसरात सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापलेले आहे. त्यातच डॉ. संजय सांगळे हे शिंदे गटाचे खंदे पदाधिकारी असताना, त्यांनी थेट आपल्याच सत्ताधारी चौकटीतील कारभारावर बोट ठेवल्याने प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. हा भ्रष्टाचार नेमका कोणी केला? चौकशी अधिकारी खरेच दबावाखाली आहेत का? आणि आता या घरच्या आहेरानंतर वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
करारनामे रद्द न केल्यास उपोषण
बाजार समितीचे सभापती डॉ. सांगळे यांनी पत्राद्वारे आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. ‘बाजार समितीच्या जागेवर झालेले सर्व बेकायदेशीर करारनामे त्वरित रद्द करावेत. तसेच बाजार समितीची ही हक्काची जमीन आणि भूखंड पुन्हा मूळ बाजार समितीच्याच कामासाठी आणि शेतकरी-व्यापार्यांच्या हितासाठी वापरण्यास देण्यात यावी. जर या मागणीवर तत्काळ योग्य पावले उचलली गेली नाहीत आणि न्याय मिळाला नाही, तर आपण स्वतः बेमुदत उपोषणाला बसणार,‘ असा स्पष्ट इशारा डॉ. सांगळे यांनी दिला आहे.
Plot scam worth crores in Manmad Agricultural Produce Market Committee?
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…