पावसाळ्यापूर्वी नदीपात्र मोकळे करण्यासाठी प्रशासन सज्ज
सिन्नर : प्रतिनिधी
शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या सरस्वती नदीच्या स्वच्छता मोहिमेला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार प्रारंभ करण्यात आला असून, पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ, गवत आणि पाणवेली हटवून नदीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. तहसील प्रशासन आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
कधीकाळी सिन्नर शहराचे वैभव असलेली सरस्वती नदी गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत होती. नदीपात्रात वाढलेले गवत, कचरा यामुळे नदीला ओंगळवाणे रूप आले होते. शहरवासीयांकडून नदीच्या स्वच्छतेची वारंवार मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी सरस्वती नदी परिसराची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी नदीची स्वच्छता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नगरपालिका आणि तहसील प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने या कामाला गती दिल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, 2022 मध्ये सरस्वती नदीला आलेल्या
महापुरामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नदीकाठावरील अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली होती. नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते तसेच अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळ्यापूर्वी नदीपात्र मोकळे करून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी स्वच्छता मोहिमेसाठी तीन पोकलेन मशिन उपलब्ध करून दिल्या असून, नगरपरिषदेकडून मनुष्यबळ तसेच इंधन पुरवठा करण्यात येत आहे. देवी मंदिराच्या पाठीमागील भागातून नदी स्वच्छतेच्या कामास सुरुवात झाली असून, प्राथमिक टप्प्यात नदीतील साचलेले पाणी चर काढून बाहेर सोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, पाणवेली आणि अडथळा निर्माण करणारा कचरा हटविण्याचे काम सुरू आहे.
नदीत वर्षानुवर्षे साचलेला गाळही मोठ्या प्रमाणात उपसण्यात येत असून, तो सुकल्यानंतर त्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, नदी स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, ही मोहीम
नियमितपणे राबवून नदीचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती करण्याची
मागणीही नागरिकांकडून होत आहे.
Saraswati River Cleanup Campaign Begins
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…