नाशिक

सोयाबीनला उच्चांकी दर; मात्र शेतकरी वंचित

बाजार समितीत प्रतिक्विंटल 7530 रुपयांचा टप्पा पार; साठेबाजांची चांदी

निफाड : अण्णासाहेब बोरगुडे
तालुक्यातील लासलगाव व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल 7530 रुपये इतका उच्चांकी दर मिळत असून, गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक दर मानला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाची वाढती मागणी, देशांतर्गत बाजारातील मर्यादित आवक आणि उपलब्ध साठ्याचा तुटवडा यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली आहे. मात्र, या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकर्‍यांना न होता साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांना आणि काही सधन शेतकर्‍यांनाच होत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले होते. केंद्र शासनाने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल 5328 रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष बाजारात दर 4100 रुपयांपर्यंत खाली आले होते. परिणामी, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्रीस काढले. शेती खर्च, कर्जफेड, घरगुती गरजा आणि इतर प्रापंचिक अडचणी भागविण्यासाठी शेतकर्‍यांना कमी दरात माल विकावा लागला. त्यामुळे शासनाचा हमीभाव केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र निर्माण झाले. राज्यात नाफेडकडून होणारी खरेदीदेखील वेळेत सुरू न झाल्याने शेतकर्‍यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.
नाफेड खरेदी प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे बाजारातील व्यापार्‍यांनी कमी दरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करून त्याचा साठा करून ठेवला असावा. आता बाजारात आवक कमी झाल्यानंतर त्याच साठवलेल्या मालाला चढ्या दराने विक्री करून व्यापारी मोठा नफा कमावत असल्याचे बोलले जात आहे. सध्या लासलगाव व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अत्यल्प प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या घरातील कोठारे रिकामी झाली असून, त्यांच्या हातात विक्रीसाठी मालच उरलेला नाही. त्यामुळे बाजारात तेजी असूनही शेतकरी हतबल असल्याचे चित्र पाहायला
मिळत आहे.
“शेतकर्‍यांकडे माल असताना भाव नव्हता आणि आता भाव आहे तर माल नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात सोयाबीनच्या दराने घेतलेली झेप ही कृषी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. बाजारातील सध्याच्या तेजीमुळे येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक किंचित वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खरी आर्थिक ताकद साठेबाज व्यापार्‍यांच्या बाजूने गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. शेतकरी मात्र पुन्हा एकदा बाजार व्यवस्थेतील असमतोलाचा बळी ठरत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र
होत आहे.

Soybean prices at record high; but farmers deprived

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

27 seconds ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

13 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

50 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago