दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. भारताने संपूर्ण मानवजातीला दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु, जेव्हा आपण योगाचा सखोल विचार करतो, तेव्हा ‘आयुर्वेद’ या आपल्या प्राचीन वैद्यकीय शास्त्राचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. खर्या अर्थाने, योग आणि आयुर्वेद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या एकत्रितपणे माणसाला परिपूर्ण आणि निरोगी आयुष्याकडे घेऊन जातात.
आयुर्वेदाचा मुख्य उद्देश स्पष्ट करताना महर्षी चरक म्हणतात- ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च’. म्हणजेच निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी व्यक्तीचा आजार दूर करणे, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी ‘योग’ हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.
आयुर्वेद हे शरीराच्या आरोग्यावर (दोष, धातू आणि मल यांच्या संतुलनावर) लक्ष केंद्रित करते, तर योग शरीरासोबतच प्रामुख्याने मन आणि आत्मा यांच्या शुद्धीवर भर देतो. शरीर निरोगी असल्याशिवाय मन शांत राहू शकत नाही आणि मन शांत असल्याशिवाय शरीराला पूर्ण स्वास्थ्य लाभू शकत नाही. त्यामुळेच शारीरिक उपचारांसाठी आयुर्वेद आणि मानसिक शांती व एकाग्रतेसाठी योग यांचा सुरेख संगम असणे गरजेचे आहे.
सर्वसाधारणपणे योग म्हणजे प्राणायाम आणि आसन हे सर्वांना माहिती आहे; पण योग हा
अष्टांग आहे.
योगाचे आठ अंग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.
आयुर्वेदानुसार आपले शरीर वात, पित्त आणि कफ या तीन दोषांवर आधारित आहे. या दोषांमधील असंतुलन
म्हणजेच आजार.
योगासने आणि प्राणायाम यांच्या नियमित सरावाने हे त्रिदोष संतुलित ठेवण्यास मोठी
मदत होते.
प्राणायाम केल्यामुळे श्वासावर नियंत्रण मिळवून शरीरातील प्राणवायूचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे मनातील ताणतणाव आणि चिंता दूर होऊन वातदोष नियंत्रणात राहतो.
सूर्यनमस्कार, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन यांसारख्या आसनांमुळे पचनसंस्था (अग्नी) सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त कफ व पित्त दोष कमी होण्यास मदत मिळते.
फक्त एक तास योगासने करून आपण निरोगी राहू शकतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. योगाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहार आणि ‘विहार’ या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपला आहार कसा असावा, ऋतूनुसार आपल्या जेवणात काय बदल करावेत (ऋतुचर्या) आणि आपली दिनचर्या कशी असावी, याचे अचूक मार्गदर्शन आयुर्वेद करते.
प्रकृतीनुसार स्निग्ध व ताजा आहार घेणे आणि जेवणाच्या वेळा पाळणे यांसारख्या छोट्या
आयुर्वेदिक सवयी योगाच्या परिणामांना दुप्पट करतात.
आजकाल मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, पीसीओडी आणि लठ्ठपणा यांसारखे जीवनशैलीशी निगडित आजार वाढत आहेत. यावर केवळ औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा, आयुर्वेदिक औषधोपचार, योग्य आहार
आणि नियमित योगाभ्यास ही त्रिसूत्री अवलंबली तर या आजारांना मुळापासून दूर ठेवता येते.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण केवळ एक दिवस योगासने करण्याचा संकल्प न करता, योग आणि
आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांना आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया. निसर्गाशी नाळ जोडणारी ही जीवनशैली आपल्याला केवळ दीर्घायुष्य देणार नाही, तर ते आयुष्य निरोगी, आनंदी आणि शांततेने जगण्याची ताकदही देईल.
सर्वांना जागतिक योग दिनाच्या निरोगी शुभेच्छा!
A sustainable path to a healthy life
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…