– वासवदत्ता अग्निहोत्री
‘अटॅक इज द बेस्ट डिफेंस’ हे सर्वांनीच ऐकले असेल. याचा अर्थ, आक्रमण हा सर्वोत्तम बचाव आहे. माणूस अनादिकाळापासून आपोआप आपले रक्षण करण्यास शिकला. ज्याच्याजवळ जितकी शक्ती होती आणि हिम्मत होती तितके त्याने
आत्मरक्षण केले. जगण्यासाठी हे फार आवश्यक होते. माणसाजवळ हत्यारं नव्हती. हिंस्र जीवांपासून प्रथम त्याला आपले रक्षण करायचे होते. त्याने आक्रमण हे हिंस्र जीवांपासूनच शिकले. पशूंना काही कला उपजतच येतात. आपले रक्षण करणे, पोहणे, वेगात धावणे, लपून बसणे हे त्यांना जन्मतःच येतात. शिकार करणे त्यांना त्यांचे आई-बाप शिकवतात. तसेच आक्रमणही ते काही शिकतात, काही त्यांच्यातही असते. कालावधीत माणूस जेव्हा गटात राहून जगायला शिकला तेव्हा आपले रक्षण करण्यास तो गटातील सक्षम लोकांना मिळवून करू लागला. कमकुवत स्त्रीला आणि लहान मुलांना सांभाळून सुरक्षित ठेवण्यास ते एकत्र मिळून हिंस्र श्वापदांच्या आक्रमणापासून आपले आणि आपल्या गटाचे संरक्षण करू लागले आणि तेव्हापासून आपले परके याचे भेद निर्माण झाले. आपापल्या क्षेत्रांच्या सरहद्दी निर्माण झाल्या आणि क्षेत्ररक्षणही होऊ लागले. विकासाच्या पायर्या चढून माणूस आता इतका संकुचित झाला आहे की, जमिनीवर तर केल्याच पण आभाळात आणि पाण्यात ही त्याने सीमा आखून घेतल्या आहेत. या सीमांचे संरक्षण म्हणून कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि सीमोल्लंघन करताच आपसात तक्रारीदेखील होतात.
असे म्हणतात की, कोंडीत सापडले तर कमकुवत पशूदेखील आक्रमक होतो. लहानसे शिंग असणारी नाजूक शेळी जरी कचाट्यात सापडली की, मान खाली घालून, शिंग रोखून आक्रमण करते. डोक्याने धडक दिल्यावर तिलाही निश्चितच इजा होत असेल, पण त्याचबरोबर आत्मरक्षार्थ काहीतरी केल्याची संतुष्टीही असते. साधारणतः कमकुवत बघून आक्रमण करतात. दोन शत्रू जर एकमेकांसमोर उभे असतील तर ते आधी समोरच्याच्या ताकदीचे आकलन करतात. आणि त्यानंतर ठरवतात की आक्रमण कसे, केव्हा आणि कुठे करायचे ते. हीच नीती आणि त्यात अनेक सुधारणा करून आजवर युद्धनीती कायम आहे. आज राष्ट्रांच्या सीमा खूप सुरक्षित आहेत, पण त्यांना सुरक्षित ठेवण्यास, आजूबाजूला आणि इतर राष्ट्रांत तसा धाक दाखवावा लागतो. प्रत्येक जण हा धाक दाखवत असतो आणि म्हणूनच आक्रमकता बाळगून असतो.
आज जगाची जी स्थिती आहे ती याच कारणास्तव आहे. आक्रमण करण्यास जी कारणे लागतात त्यात अनेकवार क्षुल्लक कारणावरून वादावाद होतात. प्रत्येक राष्ट्राची आपले अंतर्विरोध असतात, त्यांच्या समस्या असतात. त्यातून त्यांनाच निघायचे असते, पण इतर राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर त्याच समस्या अक्राळविक्राळ रूप घेऊन समोर येतात. आक्रमण हा काही अंतिम उपाय नव्हे. आजकाल घरोघरी प्रत्येक पालक या आक्रमणाला तोंड देत आहे. आपलीच मुलं आज खूप हुशार आणि बहुश्रुत झाली आहेत. त्यांना आपल्यापेक्षा जास्त दुनिया ठाऊक आहे.
त्यामुळेच ते आज आपल्यावरच आक्रमण करतात. घरातल्यांना या आक्रमणाची आता चांगलीच सवय झाली आहे. साध्या सरळ गोष्टीत आज वादविवाद होतात, वाढतात आणि काट्याचा नायटा होतो. करिअर, प्रतियोगी परीक्षा कुठली द्यावी? ही वस्तू घ्यायला हवी की नको, पैसा कुठे कसा वाचवायचा आणि खर्च करायचा, कोणाशी संबंध ठेवायचे आणि संपवायचे या आणि अशा अनेक जागेवर मुलं आक्रमक होतात. पालक म्हणून आपण आपल्या अनुभवातून काही सांगायचा प्रयत्न केला की ते आपले हल्ले आणिक वाढवतात. त्यांच्याकडे त्यांची हत्यारं असतात. मोबाइल ज्ञान, गूगल, इंटरनेट आणि पश्चिम देशातील उदाहरणे. नवी पिढी म्हणून जे काय असेल ते, हत्यार म्हणून आपल्यावर पाजळतात. आपण फक्त आपल्या वयाचे, संस्कारांचे आणि अनुभवाचे हत्यार घेऊन असतो. अनेकवार आपण माघार घेतो आणि तुम्हाला जे दिसेल ते करा…म्हणत वैतागलेली परवानगी देऊन टाकतो. कधी ते सफर करतात आणि यदाकदाचित सफल ही होतात. तोंडघशी पडल्यावर आपल्यावर केलेल्या आक्रमणाबद्दल खजिल होतात. पण सफल झाल्यानंतर लगेचच एका नव्या आक्रमणाची तयारी करतात. घरातील दैनंदिन जीवनातही हा
प्रत्यय येतो.
आपल्यावर कधीही आक्रमण झाल्यावर, आत्म सुरक्षेबाबत आपण काहीही करू शकतो हे भारतीय न्याय सांगतो. भारतीय न्याय संहिताच्या 37-38 कलमानुसार आपली मालमत्ता जपण्यासाठी आणि आपल्या शरीररक्षणासाठी आपण काहीही करू शकतो. आपल्यावर आक्रमण झाल्यावर आपल्या बचावाखातर आपण समोरच्यावर दुप्पट वेगाने आणि शक्तीने आक्रमण करू शकतो. हा आपला हक्क आहे. प्रत्येकालाच जगण्याचा हक्क आहे आणि सुरक्षित राहण्याचादेखील अधिकार आहे. या स्वरक्षणाच्या प्रक्रियेत जर समोरच्याच्या जीवावर बेतले तरी काही हरकत नसते. घरातील वयोवृद्ध लोकांवर आपणही अनेकवार आक्रमण करतो.तुम्हाला त्यातलं कळणार नाही…असे निर्णायक वाक्य त्यांना फेकून मारतो. कधीमधी कुठला राग त्यांच्यावर निघतो. हे बरोबर नाही. आक्रमण करतानादेखील समोरच्याची ताकद पहावी. आज आपण खूप आधुनिक झालो आहोत म्हणून जे वयोवृद्ध आहेत ते आपलीच धरोहर आहेत असे समजून त्यांना सन्मान द्यावा. फक्त मानाने, प्रेमानेच त्यांना जिंकता येईल…आक्रमण करण्याची गरज कधीच पडणार नाही.
Attack
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…